Breaking
महाराष्ट्र

देशाच्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे अमूल्य योगदान – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य व कला पुरस्कारांचे वितरण

0 0 1 1 5 2

शिर्डी ( प्रतिनिधी) भारताची अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. पुढील तीन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे. भारत विकसित राष्ट्र होण्यात सहकार क्षेत्राचे योगदान आहे. देशाच्या सहकार क्षेत्राच्या विकासात महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे अमूल्य योगदान आहे. असे गौरवोद्गार देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज येथे काढले.प्रवरानगर येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंतीचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर येथील नियोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे होते. व्यासपीठावर महसूल, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आ.संग्राम जगताप, आ.आशुतोष काळे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.”तूम्हा सर्व बंधू-भगिनींना नमस्कार” अशा मराठी भाषेत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी भाषणाला सुरूवात केली. ते पुढे म्हणाले, देशात सहकार चळवळ यशस्वी झाली आहे. स्वतंत्र सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे‌. सहकार क्षेत्राला पुनर्जीवित करण्याचे काम शासन करत आहे. संघटीत राहून काम करणे हे सहकार चळवळीचे मर्म आहे. सहकारातून समृद्धीकडे हा देशाचा मूलमंत्र आहे.भारतीय लोकशाही हे सहकाराचे सर्वात मोठे उदाहरण आहे‌. महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणात सहकार क्षेत्राने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. समाजाला एकसंघ ठेवण्यात कला व साहित्य क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असते‌. समाजाला दिशा देण्याचे काम ते करतात. असे ही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरावर आसूड ओढण्याचे कमी साहित्यिक व कलाकरांनी करावे. असे ही ते म्हणाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात पावसाने ओढ दिली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे आहे‌. अडचणीच्या काळात शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. श्री साईबाबा चरणी चांगला पाऊस पडावा यासाठी साकडे घातले आहे‌. देशाचे एक कर्तव्यदक्ष संरक्षण मंत्री म्हणून राजनाथ सिंह यांची देशाला ओळख आहे. पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे देशाची ताकद निश्चितच वाढली आहे. चीन व पाकिस्तानसारख्या शेजारील राष्ट्रांना आपल्या कणखर शब्दात त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे जगभरात आज भारताचे नाव आदराने घेतले जात आहे.सहकार क्षेत्राला पुढे नेण्यासाठी केंद्रा सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केले. सहकार क्षेत्राला दहा हजार कोटींचा कर माफी देण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्रशासनाने घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. सहकार चळवळ उभी करणारे विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार चळवळीचे रोपटे लावले त्याचा वटवृक्ष झालेला आज आपण पाहत आहोत.असे ही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

नियोजित अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्ष श्री.रविंद्र शोभणे म्हणाले, मराठी संत साहित्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी साहित्यांच्या माध्यमातून गरिबांच्या दुःखाला वाचा फोडली.यावेळी संरक्षण मंत्री व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय लाभार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. स्वच्छता भारत मोहीमेअंतर्गत ग्रामपंचायतीना चारचाकी वाहनांचे वितरण करण्यात आले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.प्रारंभी, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविकातून या पुरस्काराच्या मागची भूमिका विशद केली. साहित्यिक आणि कलाकारांचा या पुरस्काराने सन्मान करण्याची मिळणारी संधी हा आमचा गौरव असल्याचे स्पष्ट केले. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आभार मानले.

        या पुरस्कार्थींचा झाला सन्मान 

यावेळी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्राचार्य दिलीप धोंडगे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावाने सर्व पुरस्कार दिले जातात. यामध्ये २०२३ या वर्षासाठी साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार – सोलापूर येथील डॉ.निशिकांत ठकार, प्रबोधन पुरस्कार – पुणे येथील अशोक चौसाळकर यांना समाज प्रबोधन पत्रिकेसाठी देण्यात आला. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार – ‘महानुभाव वाड्मय : चिकित्सक समालोचन खंड १ व २ ‘ या ग्रंथासाठी पुणे येथील डॉ.शैलेजा बापट यांना तसेच राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार – ‘मूल्यत्रयीची कविता’ या कवितासंग्रहासाठी पुणे येथील विश्वास वसेकर यांना देण्यात आला. नाट्यसेवेबद्दल दिला‌ जाणारा राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार – जळगाव येथील शंभू पाटील यांना तर कला क्षेत्रा कार्याबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार- पुणे येथील वसंत अवसरीकर यांना देण्यात आला. अहमदनगर जिल्हा साहित्य पुरस्कार – ‘श्री ज्ञानेश्वर दर्शन भाग १ व २’ या ग्रंथाच्या संपादनासाठी श्रीरामपूर येथील डॉ.शिरिष लांडगे यांना तर अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार – ‘भंडारदरा धरण शतकपूर्ती ‘ या पुस्तकासाठी भंडारदरा येथील विकास पवार तर प्रवरा परिसर साहित्य पुरस्कार – ‘ते दिवस आठवून बघ’ या कवितासंग्रहासाठी कोल्हार येथील डॉ.अशोक शिंदे यांना देण्यात आला. पुरस्कार्थीं ज्येष्ठ साहित्यिक डॉ.निशिकांत ठकार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 1 5 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे