Breaking
ब्रेकिंग

त्यागातील आनंद जगणे सुंदर करते; असे सुंदर जगणे म्हणजे सुख’- प्रा.अशोक सोनवणे

0 0 1 1 5 9

त्यागातील आनंद जगणे सुंदर करते; असे सुंदर जगणे म्हणजे सुख’- प्रा.अशोक सोनवणे

🔥 आग न्युज पोर्टल नेटवर्क


कोपरगाव-” कोणतेही यश सहज मिळत नाही. त्यासाठी तपश्चर्या करावी लागते. अनेक कसोट्यांतून मिळालेले यश हे दैदीप्यमान तर असतेच; पण त्याचबरोबर ते इतरांचा विश्वास प्राप्त करणारे, त्यागाचा आदर्श निर्माण करणारे असते. अशा त्यागातील आनंद, त्याग करणाऱ्याबरोबरच इतरांचे जगणे सुंदर करते. हे सुंदर जगणे म्हणजेच सुख. हे सुख ज्याला कळते तो महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव भाऊराव, शंकरराव काळे, शरदचंद्र पवार यांच्यासारखे उत्तम व आदर्श कार्य उभे करतो.” असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांनी भूषविले.

येथील रयत शिक्षण संस्थेच्या ‘एस.एस.जी.एम कॉलेजचा वार्षिक पारितोषिक व कै.सौ. सुशीलाबाई (माई) शंकरराव काळे आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण’ समारंभ नुकताच संपन्न झाला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री. अशोक सोनवणे बोलत होते. आपल्या भाषणात सोनवणे पुढे म्हणाले की, , सुख कशात आहे? हे समजण्याला महत्त्व आहे. कर्मवीरांना ते समजले म्हणूनच महात्मा गांधींच्या प्रश्नावर त्यांनी,” शाहू राजानी पैसे नाही पण मला आभाळाएवढे मन दिले. म्हणूनच मी रयतचे कार्य करू शकलो” असे उत्तर दिले.

तर किल्लारी भूकंपा वेळी शरदचंद्र पवारांनी स्वयंसेवकांच्या गर्दीतून योग्य मार्ग काढत कामाला दिशा दिली. अशाच प्रकारे आणखी काही उदाहरणे त्यांनी या दाखल दिली. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी झटणारा समाज महासत्ता होतो. त्यामुळे या ज्ञानप्राप्तीसाठी धडपडणारे संस्था व पदाधिकारी हे संस्कार केंद्र असतात. स्वतःच्या क्षमता सिद्ध केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. म्हणून इतरांचा विश्वास प्राप्त करा. चुकीच्या गोष्टी टाळून कष्ट करा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेचा विश्वास प्राप्त केला, म्हणूनच आज ते सर्वांच्या हृदयात विराजमान झालेले आहेत. तुमच्या महाविद्यालयाने मिळविलेले नॅक A++ प्लस मानांकन हे जपण्याची व वाढविण्याची जबाबदारी तुमची आहे, हे लक्षात घ्या. असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.


ॲड. भगीरथ शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात, महाविद्यालयाला नॅक मूल्यांकनात A++ प्लस ग्रेड मिळून जे अत्युच्च यश मिळाले,त्याबद्दल योगदान देणाऱ्या सर्वच घटकांचे विशेष अभिनंदन केले. या यशाचा उत्साह ,आनंद विद्यार्थी, पालक, सेवक, नागरिक अशा सर्वच घटकांतून ओसंडून वाहताना पाहायला मिळणे, त्यासाठीचे अभिनंदन व आनंदाचा वर्षाव अनुभवायला मिळणे, ही आपल्यासारख्या रयत कार्यकर्त्यासाठी मोठी एनर्जी असल्याचे सांगितले. महाविद्यालयाने मिळविलेले हे यश व विश्वास यामुळे शेतकरी व विविध घटकांना उपयुक्त होईल असा एक आगळावेगळा प्रकल्प महाविद्यालयात राबविण्याचे रयतच्या उच्चस्तरावर ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. याबरोबरच महाविद्यालयात पारितोषिक वितरण कार्यक्रम दरवर्षीच होत असला तरी, प्रत्येक वर्षीचे पारितोषिक विजेते वेगळे असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी याला विशेष महत्त्व असल्याचा उल्लेख करून, त्यांनी सर्वच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आव्हान विद्यार्थ्यांनी पेलण्यास सक्षम व्हावे, त्याद्वारे येणाऱ्या संधींचा लाभ घ्यावा, असेही आवर्जून सांगितले.
कर्मवीर भाऊराव पाटील आणि कै.सुशीलाबाई (माई) व कै.शंकरराव काळे यांच्या प्रतिमा पूजनानंतर सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ आर. आर. सानप यांनी केले. तर डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. मा.अॅड. संदीप वर्पे यांनी जागतिक स्थरावर दरडोई उत्पन्नात जागतिकभारत पहिल्या शंभरात नाही ही मोठी शोकांतिका असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना संबोधित केले.

गुणवंत प्राध्यापकांमध्ये डॉ.भगत घनश्याम, डॉ.विलास जीवतोडे, डॉ.माया शेलार (पीएच.डी.पदवी प्राप्त व पेटंट) डॉ.वर्पे संदीप,कु.सोनाली गोसावी (सेट परीक्षा उत्तीर्ण), डॉ.दयानंद सूर्यवंशी, डॉ. अर्जुन भागवत, प्रा.किरण पवार, प्रा.सोनिया दिग्वा (ग्रंथ प्रसिद्धी) डॉ.बाबासाहेब वर्पे, डॉ. बाबासाहेब शेंडगे,प्रा.डॉ.देविदास रणधीर, प्रा.डॉ. निलेश मालपुरे, प्रा.डॉ वैशाली सुपेकर (उल्लेखनीय कामगिरी), प्रा.अमोल चंदनशिवे,(पर्यावरण मंडळ राज्य संघटक पदी नियुक्ती) प्रा.डॉ.बंडेराव तऱ्हाळ श्री. सुनील गोसावी (आदर्श सेवक पुरस्कार) इ.चा विविध कारणे सन्मान करण्यात आला.
यानंतर कै. सुशिलाबाई शंकरराव काळे (माई )आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या पारितोषिकांची घोषणा प्रा. हिंगे यांनी केली. यानुसार प्रथम क्रमांक- आकाश मोहिते, अहमदनगर , द्वितीय क्रमांक- साक्षी सवई कोपरगाव., तृतीय क्रमांक-, सानिया जगताप संगमनेर ., उत्तेजनार्थ पारितोषिके- रसिका हंडोरे निफाड, मंगेश जाधव, कोपरगाव.,कावळे श्रद्धा पिंपळगाव ., याप्रमाणे देण्यात आली. तर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात संगमनेर महाविद्यालयाचे येथील वाघ अभिषेक आणि फटांगरे अश्विनी यांना ‘फिरता-स्मृती करंडक’ सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला. यानंतर कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक विभागामध्ये विविधप्रसंगी यश प्राप्त केलेल्या आणि आपापल्या वर्गात प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी आमदार व रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष मा. आशुतोषदादा काळे, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य माजी आमदार मा. अशोकदादा काळे,व मा. श्री. बिपिनदादा कोल्हे तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा.सौ.चैतालीताई काळे व विवेक कोल्हे यांनी हार्दिक सदिच्छा पाठविल्या. सदर कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा.अॅड. संदीप वर्पे, मा. श्री. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. श्री.बाळासाहेब आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक व मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या दिमाखदार वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते. सदर कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.बंडेराव तऱ्हाळ यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.सीमा चव्हाण,सौ.डॉ.वैशाली सुपेकर, व प्रा.रवींद्र हिंगे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 1 5 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे